रायगड भूषण हा मानाचा पुरस्कार. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आणखी जोमाने काम करावे - पालकमंत्री कु.आदिती तटकरे

  


अलिबाग,दि.06 (जिमाका):- आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून, समाजासमोर आदर्श ठेवणाऱ्या व्यक्तींचा रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येत आहे. रायगड भूषण पुरस्कार अत्यंत मानाचा पुरस्कार असून, हा पुरस्कारप्राप्त व्यक्तींची जबाबदारी आणखी वाढली असल्याने त्यांनी यापुढे आणखी जोमाने काम करावे, असे आवाहन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज (दि.06 मार्च) रोजी अलिबाग येथे आयोजित रायगड भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले.

रायगड जिल्हा परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या रायगड भूषण पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते रविवारी अलिबाग येथील पी.एन.पी. नाट्यगृहात करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आमदार बालाराम पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी, उपाध्यक्ष सुधाकर घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अर्थ व बांधकाम सभापती नीलिमा पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, पनवेल नगरपालिका माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व पक्षांचे पक्षप्रतोद, जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

सर्वप्रथम परमपूज्य नानासाहेब धर्माधिकारी यांना रायगड भूषण पुरस्कार देऊन रायगड जिल्हा परिषदेने काही वर्षांपूर्वी या पुरस्कारांची सुरुवात केली. त्यानंतर नियमितपणे रायगड भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येत आहेत. मात्र 2019 नंतर कोविड निर्बंधांमुळे आज दोन वर्षांनंतर रायगड भूषण पुरस्काराचे वितरण करण्यात येत आहे. त्यामुळे पुरस्कारार्थींची संख्या जास्त असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

यावेळी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी म्हणाल्या की, समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना रायगड भूषण पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या जास्त आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या व्यक्ती जिल्ह्यात आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. पुरस्कारप्राप्त व्यक्तींनी आणखी जोमाने काम करावे.

रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे म्हणाले की, समाजात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याच्या भावनेतून रायगड जिल्हा परिषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार देण्यात येत आहे. यापुढेही पुरस्कार देण्याची परंपरा अशीच सुरू राहील. दोन वर्षानंतर पुरस्कार सोहळा होत असल्याने पुरस्कार प्राप्त व्यक्तींची संख्या जास्त आहे.

 

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक