जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा शाखेकडून पुरवठाविषयक बाबींसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन
अलिबाग,दि.23(जिमाका):- स्वातंत्र्याच्या
अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील
पुरवठाविषयक बाबींसंदर्भात रास्त भाव धान्य दुकानदार, पेट्रोल पंप व डिझेल पंपधारक,
एल.पी.जी. गॅस वितरक, खाद्यतेल व खाद्यतेलबियांचे व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/ मालक,
ऑईल कंपन्याचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी, कर्मचारी
यांच्यासाठी कार्यशाळा शुक्रवार, दि.25 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 02.00
या वेळेत जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेमध्ये
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, योजना, सुधारीत
ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील सुधारणा, ग्राहकांचे हित जोपासण्याच्या अनुषंगाने आवश्यक
बदल यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच भारत सरकारची डिजिटल इंडिया ही
महत्वाकांक्षी योजना असून तिचा उद्देश नागरिकांना सर्व शासकीय सुविधा या इलेक्ट्रॉनिक
पध्दतीने (Online) उपलब्ध करुन देणे हा आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे अन्न
व नागरी पुरवठा मंत्री श्री.छगन भुजबळ तसेच पुरवठा विभागाचे प्रधान सचिव श्री.विजय
वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील रास्त भाव धान्य दुकानदार यांचे आर्थिक
उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीकोनातून नुकतेच CSC-e- Goverance Service India
limited या कंपनीसोबत करारनाम्यावर स्वाक्षरी झालेली आहे. सीएससी सेंटर च्या माध्यमातून
राज्यातील रास्त भाव दुकानदार आता दुकानांमधून पुढील सेवा देऊ शकतात. बँकांचे सर्व
व्यवहार, रेल्वे विमान तिकिट बुकिंग, सर्व प्रकारचे बिल्स उदाहरणार्थ लाईट बिल, फोन
बिल, पाणी बिल, Health Care Services, मोबाईल, डीटीएच रिचार्ज, शेतीविषयक सर्व सेवा,
इन्कम टॅक्स रिटर्न भरणे, नवीन रेशन कार्ड, दुबार रेशन कार्ड, नावामध्ये दुरुस्ती अर्ज
इत्यादी या संदर्भात देखील चर्चा करण्यात येणार आहे.
राज्यातील रास्त
भाव दुकानदार यांचे आर्थिक स्त्रोत वाढविण्याच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने उचललेले
हे महत्वाचे पाऊल आहे. त्यानुषंगाने व इतर बाबी संदर्भात कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन
करण्यात येणार आहे. तरी या जिल्हास्तरीय कार्यशाळेस जिल्हयातील सर्व रास्त भाव धान्य
दुकानदार, पेट्रोल पंप व डिझेल पंप धारक, एल.पी.जी. गॅस वितरक, खादयतेल व खादयतेलबियांचे
व्यापारी, शिवभोजन केंद्र चालक/ मालक, ऑईल कंपन्याचे जिल्हा संघटक व असिस्टंट मॅनेजर,
तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment