भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामाजिक समता कार्यक्रमांची सुरुवात
जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांची माहिती
अलिबाग, दि.07 (जिमाका):- महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या
जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत
राज्यभरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली असून
पुढील 10 दिवस रायगड जिल्ह्यात विविध उपक्रमांद्वारे महामानव डॉ.आंबेडकर यांना
अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल
जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि.06
एप्रिल ते दि.16 एप्रिल या कालावधीत "भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
समता कार्यक्रम" राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत.
यानुसार, रायगड जिल्ह्यातही पुढील दहा दिवस विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पत्रकार
परिषद सुरू होण्यापूर्वी अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष श्री.प्रकाश सोनवडेकर,
ज्येष्ठ प्रेस फोटोग्राफर श्री.रमेश कांबळे तसेच उपस्थित प्रसारमाध्यम
प्रतिनिधींच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सामाजिक समता सप्ताह
निमित्ताने आयोजित होणारे कार्यक्रम पुढीलप्रमाणे:-
दि.07 एप्रिल रोजी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा,
वसतिगृहे, निवासी शाळा आदी ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित
वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येतील.
दि.08 एप्रिल रोजी, जिल्ह्यामधील स्वाधार शिष्यवृत्ती,
मिनिट्रॅक्टर आदी लाभार्थींना प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात येईल.
दि.09 एप्रिल रोजी, ज्येष्ठ नागरिक योजनांच्या जनजागृती संदर्भात
मेळावे किंवा तत्सम उपक्रम राबविण्यात येतील. जिल्हा आरोग्य विभागाच्या समन्वयाने जिल्ह्यातील
शैक्षणिक आस्थापनांमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले जातील.
दि.10 एप्रिल रोजी, समता दूतांमार्फत ग्रामीण व शहरी भागात
लघुनाट्य, पथनाट्य आदी माध्यमातून विभागाच्या योजनांच्या माहितीबाबत प्रबोधन
करण्यात येईल. तसेच भारतीय संविधानाची जनजागृती व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर
पथनाट्य सादर केले जाणार आहेत.
दि.11 एप्रिल रोजी, महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करून
विविध वक्त्यांना निमंत्रित करून महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रचार व प्रसार
करण्यात येईल.
दि.12 एप्रिल रोजी, मार्जिन मनी योजनेच्या जनजागृतीबाबत तसेच लाभ
मिळालेल्या लाभार्थींसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येतील.
दि.13 एप्रिल रोजी, संविधान जागर हा विशेष कार्यक्रम आयोजित
करण्यात येईल.
दि.14 एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील
सर्व कार्यालये, शाळा, वसतिगृहे इत्यादी सर्व आस्थपनांमध्ये स्थानिक
लोकप्रतिनिधींना निमंत्रित करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
करण्याचा कार्यक्रम आयोजित केला असून त्या ठिकाणी, व्याख्याने, चर्चासत्रे आदी कार्यक्रम
घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान
मेळावा आयोजित करून बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कार्याची माहिती देणारे
व्याख्यान आयोजित करण्यात येईल. याच दिवशी जिल्ह्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत
ऑनलाईन जात पडताळणी प्रमाणपत्र वितरित करण्यात येणार आहेत.
दि.15 एप्रिल रोजी जिल्ह्यातील समाजकल्याण कार्यालयात महिला मेळावे
आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये महिलांविषयी डॉ.बाबासाहेबांच्या कार्याची
माहिती देणारे कार्यक्रम घेतले जातील. तसेच तृतीयपंथी जनजागृती व नोंदणी करून
ओळखपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
दि.16 एप्रिल या अंतिम दिवशी, ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित
जाती व नवबौद्ध वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे तसेच वस्त्यांमध्ये विभागाचे लाभ
मिळालेल्या व्यक्तींचे मनोगत जाणून घेणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
रायगड जिल्ह्यात आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमांना नागरिकांनी
मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त
श्री.सुनिल जाधव यांनी यावेळी केले.
00000
Comments
Post a Comment