रायगड जिल्हास्तरीय अंमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक संपन्न
अंमली पदार्थाच्या संकटापासून वाचविण्याचा केला संकल्प
अलिबाग, दि.05 (जिमाका):- गृह विभागाच्या दि.25 मार्च 2022 च्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-0122/प्र.क्र.01/दिशा-3 अ अन्वये जिल्हास्तरावर अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी “जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती” ची स्थापना करण्यात आलेली असून या समितीची बैठक काल दि.04 मे 2022 रोजी अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सदस्यांनी समाजातील विविध घटकांना अंमली पदार्थांच्या संकटापासून वाचविण्याचा संकल्प केला.
या बैठकीस सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक श्री.जयवंत रामकृष्ण झोपे, सीमा शुल्क विभागाचे निरीक्षक श्री.सुभाष गोपाळ राणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती कीर्ती भाऊसाहेब शेडगे, कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री.गोरखनाथ रघुनाथ मुरकुटे, अन्न व औषध प्रशासन, पेणचे औषध निरीक्षक श्री.हेमंत राजाराम आडे, रायगड डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी श्री.मिलींद अनंत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास दत्तात्रय माने, नायब तहसिलदार श्री.संतोष लक्ष्मण पाटील, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे निरीक्षक श्री.विजय शिंदे आणि रायगड जिल्हा माहिती अधिकारी श्री.मनोज शिवाजी सानप हे उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीस बैठकीचा उद्देश सर्व समिती सदस्यांना समजावून सांगण्यात आला व एकत्र काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी समितीतील सदस्य, पदाधिकारी व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, रायगड जिल्ह्यात जे.एन.पी.टी., दिघी पोर्ट व इतर काही बंदरे येथे विविध वस्तूंची आयात निर्यात होत असते. त्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता अंमली पदार्थांच्या आयात-निर्यातीवर विशेष लक्ष ठेवून आलेल्या जहाजांची तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल सादर करावा. त्या माध्यमातून अंमली पदार्थाची आयात-निर्यात आढळून आल्यास तात्काळ पोलीस विभागाला कळवावे, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खसखस किंवा गांजाच्या पिकांची अवैध लागवड होणार नाही, याबाबत दक्षता घेवून तसे आढळून आल्यास तात्काळ पोलीस विभागाला कळवावे, टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुरीअर गोडाऊनची नियमितपणे तपासणी करुन डार्कनेट व कुरीअरच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी, वाहतूक व पुरवठा होणार नाही याकडे टपाल विभागाने लक्ष ठेवावे, तसेच त्या माध्यमातून अंमली पदार्थाची वाहतूक आढळून आल्यास तात्काळ पोलीस विभागाला कळवावे.
रायगड डाक विभागाने त्यांच्याकडील प्राप्त होणाऱ्या कुरीअरची नियमितपणे तपासणी करावी. तसेच कुरीअर किंवा डाक पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्यास संबंधीत पोलीस स्टेशनला त्याबाबत तात्काळ माहिती द्यावी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांच्या अधिनस्त पथके बनवून त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या, अंमली पदार्थाचे व्यसन असलेल्या व्यक्तींची माहिती व व्यसनमुक्ती केंद्राना संपर्क साधून तेथे व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्यांना कोणता अंमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन आहे, याबाबत माहिती संकलित करून पोलीस विभागाला कळवावे, असे सांगून त्यांनी रायगड जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, झोपडपट्टी परिसर इत्यादी ठिकाणी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत बॅनर, पोस्टर, पथनाट्य, सोशल मिडीया, स्थानिक प्रसारमाध्यमे याद्वारे अधिकाधिक माहितीचा प्रचार व प्रसार करून जनजागृती करण्यात यावी अशी सूचना केली.
ते पुढे म्हणाले की, पोलीस विभागातर्फे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीतील सदस्य यांना अंमली पदार्थाची ओळख व्हावी याकरिता एन.सी.बी. कडून प्रशिक्षण/शिबीर आयोजित करण्यात येईल. औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, पेण-रायगड यांना त्यांच्या विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहरात अस्तित्वात असलेले रासायनिक कारखाने यांच्यावर लक्ष ठेवून त्या कारखान्यांना वारंवार भेटी देवून कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्या कारखान्यामध्ये ज्या वस्तूचे उत्पादन होते, त्याची यादी सादर करावी तसेच जे कारखाने बंद आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवून त्यांचीही यादी सादर करावी, जिल्हयातील सर्व मेडीकल दुकानदारांना नशा करण्यासाठी वापर होणारी औषधे डॉक्टरांचा सल्ला व त्यांच्या चिठ्ठीशिवाय विकली जाणार नाहीत, तसेच प्रत्येक मेडीकल स्टोअर्स परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावावेत.
आपला जिल्हा हा समुद्रकिनारी भागात असल्याने या समितीमध्ये कोस्ट गार्ड व नेव्हीच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्याबाबत अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे विनंती पत्र सादर करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
शेवटी अपर पोलीस अधिक्षक श्री.अतुल झेंडे यांनी अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीतील उपस्थित सदस्यांना त्यांनी त्यांची कामे योग्य पध्दतीने, निष्ठेने व जबाबदारीपूर्वक वेळीच पार पाडावीत, अशा सूचना दिल्या.
यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दयानंद गावडे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये सन 2021 व सन 2022 या वर्षात अंमली पदार्थ या विषयाबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली. सन 2021 सालात एकूण 20 गुन्हे दाखल करण्यात आले असून 60 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 19 ग्रॅम मेफेड्रॉन (अंदाजे किंमत रु.38 हजार व 134 किलो 472 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत रु.16 लक्ष 67 हजार 401) असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सन 2022 मध्ये आजपर्यंत एकूण 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून 08 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 21 किलो 348 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत रु.03 लाख 42 हजार 680) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याबाबतची माहिती त्यांनी दिली.
00000
Comments
Post a Comment