प्रधानमंत्री आवास योजनेत जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग, दि.27 (जिमाका):- रायगड जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत उल्लेखनीय
कामगिरी करण्यात आली आहे. सन 2016-17 ते 2021-22 या मागील सहा वर्षात रायगड जिल्ह्यात
योजनेच्या अनुदानातून 7 हजार 333 लाभार्थ्यांनी घरकुले बांधली असून, आणखी 2 हजार 480
घरकुले बांधण्याचे काम सुरू असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
डॉ.किरण पाटील व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक निलेश घुले यांनी दिली
आहे.
जिल्हा परिषदेच्या सहकार्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या कार्यालयामार्फत
केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना,
रमाई आवास योजना व आदिम जमाती घरकुल योजना या घरकुल योजना राबविण्यात येतात. यामधील
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील भूमीहीन किंवा कच्चे
घरात वास्तव्य करणाऱ्या लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ देण्यात येतो.
2016-17 ते 2021-22 या मागील सहा वर्षात रायगड जिल्ह्याला 9 हजार 813
घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामधील 9 हजार 675 घरकुलांना मंजुरी देण्यात
आली. त्यापैकी 7 हजार 333 घरकुले बांधून पूर्ण झाली असून, 2 हजार 480 घरकुलांचे काम
प्रगतीपथावर आहे.
प्रधानमंत्री घरकुल योजना ग्रामीण
दृष्टीक्षेप:
• योजनेंतर्गत 60% निधी केंद्र शासनाकडून व 40% निधी राज्य शासनाकडून
प्राप्त होतो.
• योजनेंतर्गत ग्रामीण भागातील भूमिहीन किंवा कच्च्या घरात वास्तव्य
करणाऱ्या लाभार्थ्यास घरकुलाचा लाभ देण्यात येतो.
• या लाभार्थ्यांची निवड ही आर्थिक सामाजिक जात सर्वेक्षण 2011 नुसार
व प्रपत्र ड नुसार प्राधान्यक्रमाने करण्यात येते.
• घरकुल बांधकामासाठी 1 लाख 20 हजार रुपये अनुदान स्वरूपात घरकुलाच्या
प्रगतीनुसार देण्यात येते. तसेच मनरेगा अभि:सरण स्वरूपात 90/95 दिवसाचा रोजगार अकुशल
स्वरूपात जवळपास रूपये 18 हजार रुपये व शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत
रूपये 12 हजार रुपये असे एकूण 1 लाख 80 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
00000
Comments
Post a Comment