बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याबाबत कृषी विभागाचे आवाहन
अलिबाग, दि.10 (जिमाका):- खरीप हंगाम 2022 सुरुवात होत आहे. विविध कंपन्यांचे विविध प्रकारचे बियाणे कृषी सेवा केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. आपली फसवणूक होवू नये व नुकसान होवू नये, याकरिता शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांनी बियाणे खरेदी करताना खालीलप्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
गुणवता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे. बनावट/ भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. पावती व बियाण्यांचा संपूर्ण तपशिल जसे पीक, बाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी नमूद करावे तसेच रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टन/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याची पाकीटे सिलबद/मोहरबंद असल्याची खात्री करावी. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
तरी शेतकऱ्यांनी बियाण्यांच्या तक्रारीबाबत आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करावा. हा अर्ज कमी अंकुरनाबाबत असल्यास (बियाणे उगवण क्षमतेबाबत) पेरणी केल्यापासून 10 दिवसांच्या आत करावी. शेतकरी बांधवांनी दक्ष राहून बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन अलिबाग उपविभागीय कृषी अधिकारी श्री.कैलास वानखेडे यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment