रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि.25 जून ते दि.08 जुलै 2022 या कालावधीकरिता मनाई आदेश जारी
अलिबाग,दि.24 (जिमाका):- श्रीम.नुपूर शर्मा व श्री.नवीन जिंदाल, भारतीय जनता पक्ष प्रवक्ता यांनी मोहम्मद पैंगबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तवाच्या निषेधार्थ रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये मुस्लीम संघटनांकडून विविध आंदोलने करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने सैन्य भरती संदर्भात नव्याने लागू करण्यात आलेल्या “अग्निपथ” योजनेच्या अनुषंगाने संपूर्ण देशात युवकांमध्ये संभ्रम असल्याने, ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रामध्ये जिल्ह्यातील युवकांकडून अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही आमदारांनी बंड पुकारल्याने राज्यासह, रायगड जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटून राजकीय घडामोडींबाबत काही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. तसेच अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत श्रीम.इंदूबाई जयराम तिखंडे, रा.उक्रुळ, ता.कर्जत या सन 2011-12 या सालामध्ये मंजूर झालेल्या घरकुल योजनेचा लाभ अद्यापपर्यंत न मिळाल्याने दि.24 मार्च 2022 रोजीपासून जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसल्या आहेत.
अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या सर्व परिस्थिती लक्षात घेता, उपोषण व आंदोलनाच्या वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. तसेच कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावाच्या दृष्टीकोनातून रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि.25 जून 2022 रोजीचे 08.00 ते दि.08 जुलै 2022 रोजीचे 24.00 वाजेपर्यंत या कालावधीकरीता महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) मधील (अ), (ब), (क). (ड). (ई) व (फ) प्रमाणे पुढील कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे.
1) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, बंदूका, सुरे काठया किंवा लाठया अगर शारिरीक दुखापत करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही तत्सम वस्तू बाळगणे, 2) अंग भाजून टाकणारा पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, 3) दगड किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, 4) व्यक्ती, प्रेत, आकृत्या यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, 5) सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा देणे किंवा गाणे म्हणणे किंवा वाजविणे, 5) सभ्यता अगर नीती याविरुध्द असतील अशी जिल्हयाची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यामुळे राज्य शासन उलथून पाडण्याचा संभव आहे, अशी आवेशपूर्ण भाषणे किंवा हावभाव करणे किंवा सोंग करणे, चित्र, चिन्हे अगर कोणतीही तत्सम वस्तू, जिन्नस तयार करणे किंवा लोकांत प्रसार करणे, 6) रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत पूर्व परवानगीशिवाय पाच अगर पाचाहून अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास किंवा मिरवणूकीस मनाई राहील.
मात्र वरिष्ठांच्या आदेशानुसार किंवा कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा शासकीय अधिकाऱ्यांना अशी हत्यारे योग्यरितीने बाळगण्यासाठी अगर ठेवून घेण्यासाठी लागू नाही.
ही अधिसूचना ही खऱ्या प्रेतयात्रेसाठी, अंत्यविधीच्या जमावास अगर शासकीय समारंभासाठी लागू नाही.
तथापि, या कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणुका, इत्यादी कार्यक्रमास परवानगी देण्याचे अधिकार संबंधीत तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आले आहेत. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शांतता धोक्यात येणार नाही, यासाठी दक्ष राहावे, मात्र अशी विपरित परिस्थिती उद्भवल्यास त्याची जबाबदारी आयोजकांवर राहील, अशा प्रकारचे मनाई आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले आहेत.
00000
Comments
Post a Comment