केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना लाभ द्यावा -राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे
अलिबाग,दि.16 (जिमाका) : अन्न धान्याच्या
योजनेपासून कोणताही लाभार्थी वंचित राहू नये, म्हणून केंद्र व राज्य शासन अनेक योजना
राबवित आहे. केंद्र व राज्य शासनाच्या या योजनांचा लाभ जिल्ह्यातील गरजू लाभार्थ्यांना
द्यावा, असे प्रतिपादन राज्य अन्न आयोगाचे
अध्यक्ष महेश सूर्यकांत ढवळे यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत
Aepds अंतर्गत नियतन, उचल वाटपाचा आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी
मधुकर बोडके, सहायक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे, जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे
उप मुख्य कार्यकारी नितीन मंडलिक तसेच पुरवठा विभाग व जिल्हा परिषद विभागाचे इतर अधिकारी
कर्मचारी, उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री.ढवळे म्हणाले
की, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंमधून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना स्वस्त धान्य
दुकानांमधून अन्न धान्याचे वाटप करण्यात येते.जिल्ह्यात काही लाभार्थी असे आहेत की,
ज्यांना अद्याप शिधापित्रका मिळाली नाही, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून तो शिधापत्रिका
मिळण्यास पात्र असेल तर पंचनामा करुन त्याला योजनेचा लाभ द्यावा.जिल्ह्यातील विधवा
महिला, परितक्त्या महिला, आदिवासी बांधव, ज्यांना राहण्यासाठी घर नाही, अशा लाभार्थ्यांचा
शोध घेवून त्यांना अन्न धान्याच्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना
उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीच्या प्रारंभी जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर
बोडके यांनी जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून राबविण्यात येत असलेल्या योजनांची सविस्तर
माहिती अध्यक्ष महोदयांना दिली.
त्यानंतर श्री.ढवळे यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक
व मनपा प्रशासकीय अधिकारी (शापोआ) शालेय पोषण आहार तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी व
प्रकल्प अधिकारी शहरी व ग्रामीण यांच्यासमवेत महिला व बाल विकास सेवा योजनेंतर्गत नियतन,
उचल व वाटपाचा आढावा घेतला.
०००००००
Comments
Post a Comment