अतिवृष्टी काळात जिल्हा प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन
अलिबाग, दि.06 (जिमाका):- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दि.08 जुलै 2022 रोजी पर्यंत रेड अलर्ट दिलेला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील सखल व दरडप्रवण गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील सखल व दरडप्रवण गावातील नागरिकांनी भरतीच्या वेळी अतिवृष्टी होत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रयास जावे, समुद्र खवळलेल्या स्थितीत असल्याने मच्छिमारांनी, पर्यटकांनी व नागरिकांनी समुद्रात पोहण्यास जावू नये, पूर व दरडप्रवण भागातील नागरिकांनी आपली महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, पुढील 03 दिवस अतिवृष्टीचा इशारा असल्याने घरातील वयोवृध्द व्यक्ती, आजारी व्यक्तींसाठी आवश्यक औषधे, पिण्याचे पाणी, टॉर्च, मेणबत्ती, माचिस, ड्राय फूड यांचा पुरेसा साठा करुन ठेवावा, पावसाळ्यात पाणी दूषित होण्याची शक्यता असते, त्यामुळे पिण्याचे पाणी उकळून प्यावे, महिला, लहान मुले यांची काळजी घ्यावी.
तरी जिल्ह्यातील सखल व दरडप्रवण गावातील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment