जिल्हयातील शेतकऱ्यांनी भात पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी दि.31 ऑगस्ट पूर्वी अर्ज सादर करावेत

 

अलिबाग, दि.18 (जिमाका): राज्यामध्ये पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव केल्यास, त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल. तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यात कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

सध्याच्या पीकस्पर्धेतील महत्वाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत:- पिक स्पर्धेसाठी पिकनिहाय तालुका हा एक घटक आधारभूत धरण्यात येईल, खरीप हंगामासाठी स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी) तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल अशी एकूण 11 पिके आहेत.

प्रति तालुका किमान स्पर्धक संख्या- सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 5, पीकस्पर्धा मध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्यापिकाखाली किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे, पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पीक स्पर्धा संबंधित तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील.

तालुक्यात पीक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 सर्व गटासाठी पीकनिहाय प्रत्येकी रक्कम रुपये 300 इतके  प्रवेश शुल्क आहे.

अर्ज दाखल करण्याची तारीख- भात दि.31 ऑगस्ट 2022,  पीक स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांचे अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 7/12 8 अ चा उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) या कागदपत्रांची पूर्तता करून कृषी कार्यालयात द्यावे.

पिक स्पर्धा विजेत्यांसाठी बक्षिस स्वरुप :- तालुका पातळी-सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये पहिले ‍ बक्षिस रु.5 हजार, दुसरे बक्षिस रु.3 हजार,तिसरे बक्षिस रु.2 हजार, जिल्हा पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये पहिले ‍ बक्षिस रु.10 हजार, दुसरे बक्षिस रु.7 हजार,तिसरे बक्षिस रु.5 हजार, विभाग पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये पहिले ‍ बक्षिस रु.25 हजार, दुसरे बक्षिस रु.20 हजार,तिसरे बक्षिस रु.15 हजार,  राज्य पातळी- सर्वसाधारण व आदिवासी गट बक्षिस रुपये पहिले ‍ बक्षिस रु.50 हजार, दुसरे बक्षिस रु.40 हजार, तिसरे बक्षिस रु.30 हजार.

पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक/कृषी पर्यवेक्षक/ तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. खरीप हंगाम 2022 साठी  जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दि.31 ऑगस्ट 2022 पूर्वी अर्ज सादर करून भात पिक स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक