गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल या योजनेसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत
अलिबाग,दि.30(जिमाका):- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या गटई कामगारांची आर्थिक उन्नती व्हावी, याकरिता 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल पात्र लाभार्थ्याना शासनामार्फत मंजूर करण्यात येते. ही योजना सहाय्यक आयुक्त, समाज समाज कल्याण यांच्यामार्फत राबविण्यात येते. जेणेकरुन लाभार्थ्यांना गटई व्यवसाय चांगल्या प्रकारे करता येऊन उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होईल.
या योजनेसाठी अनुसूचित जाती गटई कामगारांकडून गटई स्टॉल मागणीचे अर्ज मागविण्यात आले आहेत. याबाबत यापूर्वीही प्रसारमाध्यमांमार्फत आवाहन करण्यात आले होते.
अनुसूचित जाती प्रवर्गातील गटई कामगारांना हा व्यवसाय करताना ऊन, वारा, पावसापासून संरक्षण मिळावे व त्यांची आर्थिक उन्नती व्हावी आणि त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी शासनाने ही योजना सन 1997 पासुन सुरु केली आहे.
या योजनेच्या अटी पुढीप्रमाणे आहेत :- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, अर्जदार हा अनुसूचित जातीतील गटई कामगार असावा, वय 18 ते 50 असावे, वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागात रु. 40 हजार, शहरी भागात रु. 50 हजार पेक्षाजास्त नसावे, गटई स्टॉलसाठी मागणी केलेली जागा ही ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांनी ताबा दिलेला असावा, किंवा स्वत:ची असावी.
तरी जिल्ह्यातील इच्छुक अनुसूचित जातीमधील गटईचे कामगारांनी सहाय्यक आयुक्त, समाज समाज कल्याण रायगड अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड -अलिबाग सुनिल जाधव यांनी केले आहे.
००००००
Comments
Post a Comment