सामाजिक न्याय विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात आपत्ती व्यवस्थापन शिबिर संपन्न

 

अलिबाग,दि.29 (जिमाका):- महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येवून उच्च शिक्षणासाठी आपण साऱ्याजणी आपली व कुटुंबाची प्रगती करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहत आहात. आपल्या गावाचे आणि घराचे नाव उज्वल करा आणि नेहमीच्या जीवनात आपत्तीला सामोरे कसे जावे, याचे ज्ञान आत्मसात करा. हे ज्ञान आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि ग्रामस्थांनाही द्या, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण व रायगड भूषण पनवेल नगरपालिकेचे माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांनी पनवेल येथे केले.

पनवेल येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रायगड भूषण आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील, संपादक नंदकिशोर धोत्रे, वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती मीनू नरहरे व आपत्ती सुरक्षा मित्र किशोर पाटील, विकास रणपिसे हे उपस्थित होते.

प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जयपाल पाटील यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात आली तर पाहुण्यांचे स्वागत गृहपाल श्रीमती नरहरे यांनी केले.

आपल्या प्रास्ताविकात श्रीमती नरहरे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे सेवा पंधरवडा मोहिमेंतर्गत वसतिगृहातील मुली व कर्मचाऱ्यांसाठी तज्ञांकडून आपत्ती व सुरक्षा विषयक व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे, असे सांगितले.

यावेळी संपादक नंदकिशोर धोत्रे व आपत्ती मित्र किशोर पाटील यांनीही मुलींना सामाजिक वर्तणुकीबाबत मार्गदर्शन केले. कळंबोली पोलीस ठाण्यातून महिला हवालदार संगीता माळी, अर्चना जाधव, पोलीस नाईक अशोक धुळे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उपस्थित मुलींना स्व-सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलातर्फे 112 क्रमांकाचा वापर केला तर आपल्या सुरक्षेसाठी आपण असाल तेथे वीस मिनिटाच्या आत पोलीस दल मदतीला येते, याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे जयपाल पाटील यांनी अपघात प्रसंगी 108 व बाळंतपणासाठी 102 रुग्णवाहिकेचा वापर, साप व विंचू दंश झाल्यास घ्यावयाची काळजी, घरातील वीज उपकरणे, गॅस सिलेंडर याबाबत घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांमार्फत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंचरत्न पलाड व आभार प्रदर्शन ऐश्वर्या वाघमारे यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक