प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना अंबिया बहार 2022-23 चा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा

 

अलिबाग, दि.20 (जिमाका):- आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना शासनाने आंबा व काजू पिकांसाठी पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना सुरू केलेली आहे. रायगड जिल्ह्याकरीता भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड, मुंबई ही कंपनी नेमलेली आहे. यांतर्गत नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते. अर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी (आंबा व काजू) योजना एैच्छिक आहे. या योजनेंतर्गत जोखमीच्या बाबींमुळे होणाऱ्या पिकाच्या नुकसानीस नमूद कालावधी पर्यंत विमा संरक्षण दिले जाईल.

फळपिक:- काजू, समाविष्ट धोके:- 1) अवेळी पाऊस (विमा संरक्षण कालावधी- दि.1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी), विमा संरक्षित रक्कम:- रु.1 लाख, 2) कमी तापमान (विमा संरक्षण कालावधी- दि.1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी), विमा संरक्षित रक्कम:- रु.1 लाख, 3) गारपीट (विमा संरक्षण कालावधी- दि.1 जानेवारी ते 30 एप्रिल), विमा संरक्षित रक्कम:- रु.33 हजार 333, विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख:- 30 नोव्हेंबर 2022.

फळपिक:- आंबा, समाविष्ट धोके:- 1) अवेळी पाऊस (विमा संरक्षण कालावधी- दि.1 डिसेंबर ते 15 मे), विमा संरक्षित रक्कम:- रु.1 लाख 40 हजार, 2) कमी तापमान (विमा संरक्षण कालावधी- दि.1 जानेवारी ते 10 मार्च), विमा संरक्षित रक्कम:- रु.1 लाख 40 हजार, 3) जास्त तापमान (विमा संरक्षण कालावधी- दि.1 मार्च ते 15 मे), विमा संरक्षित रक्कम:- रु.1 लाख 40 हजार, 4) वेगाचा वारा (विमा संरक्षण कालावधी- दि.10 एप्रिल ते 15 मे), विमा संरक्षित रक्कम:- रु.1 लाख 40 हजार, 5) गारपीट (विमा संरक्षण कालावधी- दि.1 फेब्रुवारी ते 31 मे), विमा संरक्षित रक्कम:- रु.46 हजार 667, विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख:- 30 नोव्हेंबर 2022.

आंबा फळपिकाकरीता प्रति हेक्टर रक्कम रु.29 हजार 400 व काजू फळपिकाकरीता प्रति हेक्टर रक्कम रु.5 हजार इतका विमा हप्ता आहे. गारपीट या हवामान धोक्यापासून विमा संरक्षासाठी अतिरीक्त विमा हप्ता आंबा फळपिकाकरीता रक्कम रु.2 हजार 333 व काजू पिकाकरीता रक्कम रु.1 हजार 667 प्रति हेक्टर आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षी योजनेत सहभागी व्हावे. सन 2021-22 मध्ये जिल्ह्यात एकूण 5 हजार 661 इतक्या शेतकऱ्यांनी रु.70.86 लाख इतका विमा हप्ता भरून 2469.89 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला होता. त्यामध्ये सर्वच विमाधारक 5 हजार 669 शेतकऱ्यांना रक्कम रु.22.26 कोटी इतकी विमा भरपाई रक्कम मिळाली आहे.

विमा हप्ता भरण्यासाठी शेतकऱ्यांकरिता बँक सी.एस.सी. सेंटर किंवा पीक विमा पोर्टल (https://pmfby.gov.in) येथे सुविधा उपलब्ध असून अधिक माहितीकरिता तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच आंबा व काजू पिकाकरीता विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि.30 नोव्हेंबर 2022 निश्चित असून आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या पिकाचा विमा काढावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक