भारतीय उद्योजकता विकास संस्था, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना करणार आत्मनिर्भर -महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या

 

अलिबाग, दि.20 (जिमाका):- भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) व टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड, मुंबई तसेच जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे दिव्यांगांकरिता एक महिना कालावधीचा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचा प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र सभागृह, अलिबाग येथे दि.18 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला.

या प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण प्रसंगी भारतीय उद्योजकता विकास संस्था, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या यांनी केले.

भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) व टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेड मुंबई द्वारा उदया प्रकल्पांतर्गत अलिबाग तालुक्यातील दिव्यांगांकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाच्या विविध संधींची ओळख, संवाद कौशल्य, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, शासकीय कर्ज योजनांची माहिती, प्रकल्प अहवाल तयार करणे, क्षेत्र भेट, बाजारपेठ सर्वेक्षण, डिजिटल मार्केटिंग, मार्केटिंग कौशल्य अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस.हरळय्या, बँक ऑफ इंडिया चे जिल्हा प्रबंधक विजयकुमार कुलकर्णी, टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडच्या सामाजिक दायित्व विभाग प्रमुख पल्लवी बरुआ, सामाजिक दायित्व विभाग व्यवस्थापक संगीता पाध्ये, जॉन डिसुझा, भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय), प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश सोळंकी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय) चे प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी केले तर डॉ.प्रकाश सोळंकी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

यावेळी प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला जिल्हा उद्योग केंद्राचे मोलाचे सहकार्य लाभले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक