कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व स्वदेस फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार
अलिबाग,दि.27 (जिमाका :- जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील
शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रायगड व स्वदेस फाउंडेशन यांच्यात
कृषी विकास कार्यक्रमांतर्गत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. सामंजस्य करारावर स्वदेस
फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रूवाला व प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी
स्वाक्षरी केल्या.
यावेळी उपसंचालक जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय काळभोर, उपसंचालक आत्मा तथा नोडल अधिकारी (स्मार्ट)
सतीश बोऱ्हाडे आणि पुरवठा व मूल्य साखळी तज्ञ, जिल्हा अंमलबजावणी कक्ष ( स्मार्ट) भाऊसाहेब
गावडे, स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, संचालक प्रदीप साठे,
उपसंचालक तुषार इनामदार, नीता हरमलकर, महाव्यवस्थापक प्रसाद पाटील, अफशान शेख उपस्थित
होते.
सामंजस्य करारांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये स्वदेस
फाउंडेशन काम करीत असलेल्या गावांमध्ये तीन वर्षांमध्ये पोलादपूर , महाड, माणगाव, तळा,
म्हसळा, श्रीवर्धन व सुधागड तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी
कृषी विस्तार कार्यक्रमांतर्गत मँगो नेट नोंदणी, मॅंगो जीआय नोंदणी, शेतकरी कंपनीची
स्थापना, शेतकरी गट निर्मिती, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना प्रकल्प अंमलबजावणी,
स्मार्ट प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ, बांबू विलेज निर्मिती, किसान क्रेडिट कार्ड
नोंदणी व लाभ, सौर ऊर्जा कुंपण लाभ, प्रधानमंत्री पिक विमा योजना लाभ व शेतकऱ्यांना
विविध प्रशिक्षण या विषयांवर स्वदेस फाउंडेशन व कृषी विभाग एकत्रितपणे समन्वयाने काम
करणार आहेत.
सामंजस्य कराराचा लाभ
स्वदेस फाउंडेशन अंतर्गत असणाऱ्या “स्वप्नातील गावां”मधील शेतकऱ्यांना होणार असून कृषी विभागाच्या योजना
जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वदेस फाउंडेशन व कृषी विभाग प्रयत्न
करेल असे मत स्वदेस फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी सामंजस्य
करार कार्यक्रमादरम्यान केले
सामंजस्य करारामुळे
रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी
स्वदेस फाउंडेशन सोबत कृषी विभाग एकत्रितपणे काम करेल, असे नमूद करून कृषी विभागाच्या
योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी
स्वदेश फांऊडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी आभार मानले.
०००००००
Comments
Post a Comment