पीक संरक्षण घरच्या घरी उपयोगी आहे निंबोळी अर्क..!
रसायनांच्या अतिवापरामुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास सुध्दा निश्चितपणे थांबविता येऊ शकतो. त्यासाठी एकात्मिक किडरोग पध्दतीमधील शिफारसीचा अवलंब सर्वांनी करावा. त्या पध्दतीमधील अत्यंत महत्वाचा व तितकाच प्रभावी उपाय म्हणजे निंबोळी अर्क. काय आहे निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत, त्याचे लाभ समजून घेवू, या लेखाद्वारे..!
निंबोळी अर्क तयार करण्याची पध्दत :-
शेतीच्या बांधावरील, रस्त्याच्या कडेला असलेल्या कडुनिंबाच्या झाडाखाली पडलेल्या चांगल्या पिकलेल्या निंबोळ्या वेचून गोळा करा. गोळा केलेल्या निबोळ्यांची साल वेगळी करून बियांचा गर स्वच्छ धुवून काढा. गरात साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यावर बुरशी वाढण्याची शक्यता असते. साल व गर काढलेल्या निंबोळीच्या बिया चांगल्या सुकवून कोरड्या जागी साठवून ठेवा. चांगल्या सुकलेल्या निंबोळ्यांच्या बिया घेऊन त्या खलबत्यात कुटून चांगल्या बारीक करून घ्या. प्रमाणात निंबोळ्या गोळा झाल्या असल्यास पल्चरायझरच्या सहाय्यानेसुध्दा पावडर करता येईल. फवारणीच्या आदल्या दिवशी सायंकाळी पाच किलो बारीक केलेली निंबोळी पावडर नऊ लिटर भिजत टाका. तसेच एक लिटर पाण्यात 200 ग्राम साबणाचा चुरा वेगळा भिजत टाका. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजत टाकलेल्या निंबोळीच्या अर्क स्वच्छ कपड्यातून चांगला गाळून या अर्कात 1 लिटर पाण्यात तयार केलेले साबणाचे द्रावण मिसळा. हा अर्क 10 लिटर होईल एवढे पाणी टाका. एका टाकीमध्ये 90 लिटर पाणी घ्या व वरील 10 लिटर चे द्रावण त्यामध्ये मिक्स करून घ्या आणि ढवळा. अशा प्रकारे 5% निंबोळी अर्क तयार झाला आहे. 5% निंबोळी अर्क 500-1000 मि.ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. निंबोळी अर्क फवारणीच्या दिवशीच तयार करून वापरावे. मावा, अमेरिकन बोंडअळ्या, तुडतुडे, पाने पोखरणारी व देठ कुरतडणारी अळी, फळमाशा, खोडकीडा अनेक किडींवर याचा प्रभाव पडतो तसेच फवारणीमुळे रसशोषक किडींचा प्राभाव कमी होतो.
पिकातील किडींच्या नियंत्रणासाठी महागडी रासायनिक किटकनाशके किंवा ज्याच्या गुणवत्तेबाबत फारशी खात्री देता येणार नाही, अशी सेंद्रीय उत्पादने बाजारातून खरेदी करण्यापेक्षा निसर्गतः उपलब्ध असलेल्या निंबोळीच्या वापरामुळे अगदी अल्प खर्चात घरच्याघरी प्रभावी नैसर्गिक किटकनाशक तयार होते. याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी वापर करावा आणि रसायनांमुळे होणारे दुष्परिणाम टाळण्याबरोबरच उत्पादन खर्चात सुध्दा काटकसर करून आपला निव्वळ नफा वाढवावा, असे आवाहन जिल्ह्यातील समस्त शेतकरी बंधू-भगिनींना करण्यात येत आहे. तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.
00000000
Comments
Post a Comment