काळजी घ्या..किटकनाशके फवारणी करताना..!
बऱ्याचदा शेतात काम करताना शेतपिकाच्या संरक्षणासाठी किटकनाशक फवारणी आवश्यक ठरते. शेतीच्या कामातील तो एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे किटकनाशके फवारणीचे काम करताना स्वत:ची व आपल्या बरोबर काम करणाऱ्या व्यक्तीचीही काळजी घेणे क्रमप्राप्त असते. ही काळजी कशी घ्यावी, याविषयी पुढील लेखातून समजून घेवू या…!
- किटकनाशक वापरापूर्वी बाटलीवरील लेबल व माहिती पत्रक वाचून खबरदारीच्या सर्व सूचनांचे पालन करावे.
- डब्यावरील लाल रंगाचे पतंगाच्या आकाराचे चिन्ह असलेली किटकनाशके सर्वात विषारी त्यानंतर पिवळा, निळा व हिरवा असा क्रम लागतो ही चिन्हे सोपी व सर्वसाधारण, निरक्षर व्यक्तींसाठी समजण्यासाठी असतात.
- तणनाशके फवारणीचा पंप चुकूनही किटनाशके फवारणीसाठी वापरू नये.
- मुदतबाह्य किटकनाशकाची फवारणी करू नये.
किटकनाशकाचे मिश्रण तयार करताना कोणती काळजी घ्यावी?:-
- कृषी विभागाने शिफारस केलेल्या प्रमाणातच रसायने घ्यावी,
- रसायनांच्या भुकटीला सुरूवातीला पाण्यात मिसळावे
- त्यानंतर गरजेनुसार त्यात पाणी टाकावे,
- किटकनाशक हुंगणे किंवा त्याचा वास घेणे टाळावे.
किटकनाशकांची फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी? :-
- मिश्रण तयार करताना हातमोजे घालणे आणि तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे,
- सोबतच फवारणी करतांना अंग झाकलेले असणे गरजेचे असते, यामध्ये हात आणि पायात मोजे, तोंडाला मास्क, डोक्यावर, कापड आणि अंगभर कपडे घालणे गरजेचे आहे.
- फवारणी करताना पंपाचे नोझल शरिरापासून दूर धरावे, जेणेकरून किटकनाशक अंगावर पडणार नाही, कारण विषबाधा झालेल्या बहुतांशी शेतकऱ्यांमध्ये हीच तक्रार दिसून आली आहे,
- वाऱ्याच्या विरूध्द दिशेने फवारणी करू नये,
- पाऊस येण्याआधी किंवा पाऊस झाल्यानंतर फवारणी करू नये,
- फवारणी झाल्यानंतर काही काळ शेतात जाणं टाळावे,
- फवारणी करताना वापरलेले कपडे किंवा वस्तू इतर कामांसाठी वापरू नये,
- फवारणी वेळी तंबाखू खाणे अथवा धुम्रपान करणे टाळावे,
- किटकनाशक फवारणीचे काम 8 तासापेक्षा जास्त करू नये,
- फवारणी उपाशीपोटी न करता सकाळी न्याहारी करावी.
किटकनाशक फवारणी यंत्राबाबत कोणती काळजी घ्यावी? :-
- झिजलेले, खराब झालेले नोझल्स बदलून टाकावे,
- किटकनाशक फवारताना योग्य नोझलची निवड करणेही गरजेचे असते,
- तणनाशकासाठी वापरलेला पंप किटकनाशकासाठी वापर करू नये,
- नोझल अथवा पंप गळका असल्यास त्याचा वापर टाळावा,
- किटकनाशके फवारणी यंत्रास भरतांना नरसाळ्याचा उपयोग करावा.
फवारणीनंतर कोणती काळजी घ्यावी?:-
- फवारणीसाठी वापरलेले सर्व साहित्य स्वच्छ धुवून ठेवावे,
- फवारणीचे काम झाल्यावर हात-पाय, अंग स्वच्छ धुवून खान-पान करावे,
- फवारणीसाठी वापरलेले साहित्य नदी नाल्यात किंवा विहिरीजवळ धुवू नये.
- फवारणीचे साहित्य धुतल्यानंतर वापरलेले पाणी पडीक जमिनीत टाकावे,
- किटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या जमिनीत गाडून टाकाव्यात.
विषबाधेची लक्षणे कोणती व उपाययोजना कोणत्या ?
विषबाधेची लक्षणे :-
- अशक्तपणा व चक्कर येणे,
- त्वचेची जळजळ होणे,
- डाग पडणे,
- घाम येणे,
- डोळ्याची जळजळ होणे,डोळयातून पाणी येणे, अंधुक दिसणे,
- तोंडातून लाळ गळणे, तोंडाची आग होणे,
- उलटी येणे, मळमळणे,
- हगवण होणे,
- पोटात दुखणे, स्नायू दुखी, डोकेदुखी,
- जीभ लुळी पडणे,
- बेशुध्द होणे,
- अस्वस्थ होणे,
विषबाधेनंतर कोणती माहिती डॉक्टरांना द्यावी? :-
- रोग्याचा किटकनाशकांशी संपर्क आला होता काय ?,
- नेमके कोणते किटकनाशक वापरले ?,
- शरिरात किती गेले? व ते केव्हा गेले ?,
- विषबाधेचे निदान करण्यासाठी डॉक्टरांसाठी वरील माहिती महत्वाची असते.
विषबाधेनंतर तातडीने कोणते प्रथमोपचार करावेत ?:-
- किटकनाशके/ तणनाशके डोळ्यात गेल्यास, तात्काळ डोळे स्वच्छ पाण्याने 5 मिनिटांपर्यंत धुवावेत,
- शरीरावर किटकनाशक उडाले असल्यास शरीराचा तो भाग 10 मिनिटे साबणाने स्वच्छ धुवावे व दवाखान्यात न्यावे.
- विषबाधेनंतर रोगी जर संपूर्ण शुध्दीवर असेल तरच त्याला उलटी करण्यास प्रवृत्त करावे अन्यथा नाही,
- एक चमचा बारीक लाकडी कोळसा भुकटी करून अर्धा ग्लास पाण्यातून पाजा व लगेच दवाखान्यात न्यावे,
- विषारी औषध कपड्यांवर उडाले असल्यास ते कपडे लगेच बदला व रोग्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात पोहोचवा.
00000000
Comments
Post a Comment