विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी'वर ऑनलाईन अर्ज सादर करावेत--- सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव
अलिबाग,दि.11(जिमाका) :-मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या शिक्षणात खंड पडू नये, याकरिता शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. विद्यार्थ्याकडून अर्ज केले जात असून दि.6 जानेवारी 2023 पर्यंत 11 हजार 396 विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत प्रत्येक वर्षी अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि राज्य शासनाची शिक्षण, परीक्षा शुल्क आदी योजनांचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विभागाच्या पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सन-2022-23 या वर्षाकरिता प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
ऑक्टोबरपासून प्रारंभ:- सन-2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याची प्रक्रिया पहिल्या आठवड्यापासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील 11 हजार 396 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.
कोणत्या प्रवर्गातील किती विद्यार्थ्यांनी केले अर्ज ? :- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय विभाग तर विजाभज, इमाव, विमा प्रवर्गास इतर मागास बहुजन कल्याण विभाग शिष्यवृत्ती देतो. अनुसूचित जाती प्रवर्गातील 2 हजार 870 तर विजाभज, इमाव, विमा प्रवर्गाचे 8 हजार 526 अर्ज आले आहेत.
महाविद्यालयांत समान संधी केंद्रातही भरता येणार अर्ज ? :- विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास अडचणींचा सामना करता येऊ नये, याकरिता प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी एक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
कोणकोणते अर्ज करता येणार? :-विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, फ्रीशिप शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो. उत्पन्न व प्रवर्गावर आधारित शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो. अन्य शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येतो.
सन-2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मागील महिन्यापासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमा प्रवर्गातील 23 हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. तरी 11 हजार 396 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. आजपर्यंत 50 टक्के अर्ज नोंदणीकृत झाले आहेत. तरी विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, श्री.सुनिल जाधव यांनी केले आहे.
०००००००
Comments
Post a Comment