कृषी महोत्सवातून होत आहे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आयुक्त कृषी श्री.सुनील चव्हाण यांचे प्रतिपादन
अलिबाग,दि.13(जिमाका):- महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा रायगड-अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा कृषी महोत्सव 2023 चे आयोजन 9 ते 13 फेब्रुवारी या कालावधीत सेक्टर 27, कामोठे, पनवेल येथे करण्यात आले आहे, तरी सदर कृषी महोत्सवांना मा.आयुक्त कृषी यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
रविवार, दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी मा.आयुक्त कृषी श्री.सुनील चव्हाण यांनी रायगड जिल्हा कृषी महोत्सव-2023 कामोठे,नवी मुंबई येथे सपत्नीक भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले यांनी त्यांचे स्वागत केले मा.आयुक्त, श्री.चव्हाण यांनी कृषी विभागाच्या दालनामधील जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण कृषी उत्पादनाच्या नमून्यांची त्याचप्रमाणे विभागाने केलेले जलकुंड, SRT, पॉलिहाऊस यांचे मॉडेल्स यांची पाहणी केली. तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषी विभागांनी तयार केलेल्या पौष्टिक तृणधान्य दालनातील कृषी विभागाच्या जिल्ह्यातील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तयार करून आणलेल्या पौष्टिक तृणधान्यांच्या विविध स्टॉललाही भेट दिली. यावेळी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी तयार करण्यात आलेले क्यूआर कोडबाबत माहिती देण्यात आली, त्याचबरोबर त्यांनी सर्व स्टॉलची पाहणी करीत शेतकरी व महिला बचत गटातील सदस्यांना पॅकिंग व ब्रॅण्डिंग वरती लक्ष देण्याबाबत मार्गदर्शन केले. शेतकरी ते ग्राहक थेट विक्री स्टॉलला भेट देऊन तृणधान्य खाण्याची शारीरिक गरज असून परंपरेनुसार चालत आलेली नाचणी, वरी, बाजरी यांचे आहारातील प्रमाण निरोगी आयुष्यासाठी उपयुक्त असते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विद्यापीठ,संलग्न विभाग,पी.एम.एफ.एम.एम.ई चे लाभार्थी त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपनी उद्योजक, सेंद्रिय शेती उत्पादक शेतकरी, वैयक्तिक शेतकरी त्याचप्रमाणे एम.एस.आर.एल.एम. आणि माविम यांच्या लाभार्थ्यांचे स्टॉल त्याचप्रमाणे कृषी निविष्ठा, कृषी अवजारे यांचा भात शेती,आंबा पीक पद्धतीमध्ये होणारा सहभाग याबाबत सहभागी शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन माहिती घेतली. तसेच कृषीपूर्वक लघुउद्योग वाढविण्यासाठी कृषी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महोत्सवामध्ये आयोजित पाककला स्पर्धेमधील विविध पदार्थांचा आस्वाद घेतला आणि आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी मा.आयुक्त कृषी यांच्या हस्ते पी. एम. एफ. एम. एम. ई. स्मार्ट अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी व भात पीक स्पर्धा या योजनेतील लाभार्थी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शेवटी मा.आयुक्तांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती उज्वला बाणखेले आणि कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे कृषी महोत्सवाबाबत अभिनंदन करून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री बाबत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मार्केट व दरा बाबत समाधान व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
00000000
Comments
Post a Comment