जलदिनानिमित्त जिल्ह्यात होणार विशेष ग्रामसभेचे आयोजन
अलिबाग,दि.21 (जिमाका):- जागतिक जल दिन 22 मार्च चे औचित्य साधून जल जीवन मिशन अंतर्गत काम पूर्ण झालेल्या गावांनी “हर घर जल” ची घोषणा तसेच हागणदारीमुक्त अधिक (ओडिफ प्लस) निकषाची पूर्तता केलेल्या गावांनी 22 मार्च जागतिक जलदिनी गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करून गाव “हर घर जल” व “हागणदारी मुक्त” घोषित करण्याचे आवाहन रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे.
जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील सर्व घरांना कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक संस्थांना नळ जोडणी द्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमित करीत असल्यास गावात ग्रामसभेत बैठक घेऊन हर घर जल ची घोषणा करावी तसेच गावात हागणदारीमुक्त अधिक ओडिफ प्लस यांनी निकषाची पूर्तता यामध्ये गावातील सर्व कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, गोबरधन, मैला गाळ व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषाची पूर्तता केल्यास ग्रामसभेत बैठक घेऊन ठराव पारित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
दि. 22 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो. या निमित्ताने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हयात जल जागृतीकरिता ग्रामपंचायतस्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी जागतिक जल दिनानिमित्त जलपूजन करण्यात येणार असून त्यावेळी जल प्रतिज्ञाही घेण्यात येणार आहे. सर्व ग्रामपंचायतीमध्ये FIK किट व्दारे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करणे , सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्रोत परिसर स्वच्छता तसेच पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता करणे, ग्रामपंचायत स्तरावर महिला बचतगट व ग्रामस्थ यांना घेऊन पाणी बचत करणे, घरोघरी नळ जोडणी, पाणीपट्टी वसुलीसाठी जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करून पाणी व स्वच्छतेबाबत सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले केले आहे.
00000000
Comments
Post a Comment