बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा “आपल्या गावातच” मोहीम कालावधीस दि.30 मे पर्यंत मुदतवाढ

 

            अलिबाग,दि.23 (जिमाका):- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटूंबास रु.2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे रु.6 हजार प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो. या योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून 2023 मध्ये जमा होणार आहे.  केंद्र शासनाने 14 व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले असून आयपीपीबी मार्फत गाव पातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा कालावधी दि.30 मे 2023  पर्यंत वाढविण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी श्री.संदेश शिर्के यांनी दिली आहे.   

रायगड जिल्ह्यात सद्य:स्थितीत 23 हजार 5 लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. तसेच 12 हजार 430 लाभार्थ्यांचे e-KYC प्रमाणिकरण झालेले नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

            लाभार्थींना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाची जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्तर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधारकार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट  बँक (आयपीपीबी) मध्ये खाते उघडावे.  हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडला जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही.

               पी.एम.किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास आयुक्त कृषी कार्यालयामार्फत गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्तर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबी मध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14 व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केले असल्याने आयपीपीबी मार्फत गाव पातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा कालावधी दि.30 मे 2023  पर्यंत वाढविण्यात आला आहे.     

              आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे. तसेच ज्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण झालेले नाही, अशा लाभार्थींनी ई-केवायसी प्रमाणिकरण दि.30 मे 2023  पूर्वी करुन घ्यावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी श्री.संदेश शिर्के यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक