शेतकऱ्यांसाठी पेरणी व आपत्कालीन पिक परिस्थितीतील नियोजनाबाबत कृषी विभागाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर

 

 

अलिबाग,दि.23 (जिमाका) :- भारतीय हवामान विभागानुसार राज्यात मान्सूनचे आगमन साधारणतः 7 जूनच्या दरम्यान होते. यावर्षी दि. 11 जून रोजी कोकण विभागामध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे. परंतु राज्यात उर्वरित ठिकाणी मान्सूनचे आगमन झाले नाही. सद्य:स्थितीत दि. 21 जून 2023 अखेर सरासरी पर्जन्यमान 145.3 मिमी असून प्रत्यक्षात मात्र 16.7मिमी (सरासरीच्या 11.5 टक्के) पाऊस पडलेला आहे. तसेच खरीप हंगामातील सरासरी पेरणीचे क्षेत्र 152.97 लाख हेक्टर असून दि.21 जून 2023 अखेर प्रत्यक्षात 1.98 लाख हेक्टर (1.30 टक्के) पेरणी झाली आहे.

     महाराष्ट्र राज्यामध्ये मान्सून आगमनास विलंब होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांनी पेरणी करताना काय दक्षता घ्यावी तसेच आपत्कालीन पिक परिस्थितीत काय नियोजन करावे, याबाबत कृषी मंत्री महोदयांनी, अपर मुख्य सचिव कृषी आयुक्त कृषी, सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणी भारतीय हवामान विभागाचे वरीष्ठ शास्त्रज्ञ श्री. के.एस. हौसळीकर यांच्या समवेत दि.21 जून 2023 रोजी बैठक घेवून सर्व संबंधितांबरोबर चर्चा केली. त्यानुसार हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. यामुळे नवीन सामान्य पाऊस कालावधी (New Normal Monsoon Period) येण्याचा कालावधी दि.24 ते दि.25 जून असेल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.

              हवामान विभागाच्या या अंदाजानुसार दि.24 व दि.25 जून नंतर अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांना गती मिळण्याची शक्यता असल्याने सर्वदूर चांगला पाऊस पडण्यास सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.

              यासंदर्भात शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, सर्वसामान्यतः शेतकऱ्यांनी 80 ते 100 मि.मी. पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये, शेतकऱ्यांनी लवकर येणाऱ्या व पाण्याचा ताण सहन करणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी, मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करू नये, पेरणी करताना साधारणपणे 20 टक्के जादा बियाणांचा वापर करावा, सलग संपूर्ण क्षेत्रावर एकच पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा वापर करावा, पेरणी करताना रुंद सरी वरंबा पद्धतीने (बीबीएफ) पेरणी करावी, जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादन ( मल्चींग) सारख्या तंत्राचा वापर करावा.

               हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. या पावसाच्या अंदाजाची माहिती प्रसिद्धीमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येईल. कृषी विद्यापीठ, कृषी विद्यापीठांचे संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्र यांच्या सहाय्याने स्थानिक आपत्कालीन पिक नियोजन करण्यात येत आहे.  

                क्षेत्रीय यंत्रणांना या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मान्सूनचा अंदाज घेवून पेरणीच्या वेळी पुरेशा प्रमाणात उत्तम दर्जाचे बी-बियाणे, खते व किटकनाशके शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार व रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे, शेतकऱ्यांना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी लागणाऱ्या कृषी निविष्ठांचा साठा उपलब्ध होइल यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.  शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. शेतकरी 1800-2334000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

             तरी शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक