इरशाळवाडी घटनेतील पीडितांचे सामान्यजीवन पूर्ववत सुरू व्हावे यासाठी शासन स्तरावरून मोठे प्रयत्न
अलिबाग,दि.23 (जिमाका):- इरशाळवाडी येथील दरडग्रस्त पीडितांचे जनजीवन सुरळीत व्हावे आणि त्यांचे पुनर्वसन व्हावे या दृष्टीने शासकीय स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत त्यांचे तात्पुरते निवारे सुसज्ज करणे या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना उपचार करून बरे करणे आणि मानसिक दृष्ट्या समुपदेशनाद्वारे त्यांना आधार देणे आदी कामे सुरू आहेत
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालय रायगड अलिबाग च्या पथकाने इर्शाळवाडी येथील दरडग्रस्त जखमी व्यक्तींना ग्रामीण रुग्णालय चौक येथे जाऊन त्यांचे मनोबल वाढविले तसेच त्यांना भविष्यात ताकदीने उभे राहण्यासाठी समुपदेशन केले.
त्यानंतर दराडग्रस्त गावातील व्यक्तींना व मृतांच्या नातेवाईकांना तात्पुरत्या निवारा केंद्र (रेस्क्यु कॅम्प ) येथे जाऊन मानसिक आधार देऊन समुपदेशन केले. श्रीमती प्रफुल्ला कांबळे क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, श्रीमती धनेश्वरी कडू, समाजसेवा अधीक्षक मनोविकृती आणि श्री.विशाल दामोदरे, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता यांनी समुपदेशनाचे कार्य केले. डॉ.अर्चना सिंह, मानसोपचारतज्ञ यांनी आवश्यकता असेल त्या पीडित व्यक्तींना औषधोपचार केले.
पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले प्रविण पारधे वय 21 वर्ष, तुकाराम नामी पारधी वय 35 वर्षे यांना काल दि.22 जुलै 2023 रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर भगवान हरी भवर वय 28 व यशवंत दोरे वय 35, उपचार सुरु आहेत. 18 वयापर्यंतच्या येथील मुला मुलींचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व शिक्षण पूर्ण व्हावे, यासाठी त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्तक घेतले आहे. यासह विविध स्वयंसेवी संस्था देखील त्यांच्या पाठीच्या उभे राहत असून याद्वारे त्यांचे भविष्य सुरक्षित होणार आहे
त्यांचे शासकीय जमिनीवर कायमस्वरूपी पक्के घर बांधून देऊन पुनर्वसन करण्यात येणार आहे, ते होईपर्यंत त्यांना तात्पुरत्या स्वरूपात परंतु सुविधा संपन्न असे भक्कम निवारे देण्याचे काम शासन नियोजन करीत असलेल्या 32 कंटेनर द्वारे होणार आहे ग्रामपंचायत चौक हद्दीत जवळील शासकीय जागेत यासाठी तयारी पूर्ण होत आहेत.
00000
Comments
Post a Comment