‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानाचे पनवेल येथे आज आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
रायगड (जिमाका) दि.28:- दिव्यांग कल्याण विभाग ‘दिव्यांगांच्या दारी’ अभियानातर्गत मंगळवार दि. 29 ऑगस्ट रोजी विरुपाक्ष मंगल कार्यालय, अशेाक बाग, जुना पनवेल येथे सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी मेळाव्याच्या प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी भेट देऊन पूर्वतयारीची पाहाणी केली आणि आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालय रायगड, जिल्हा परिषद रायगड आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांग अभियानाचे मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याच्या पूर्वतयारीबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी पंचायत समिती पनवेल येथे आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी डॉ. शामराव कदम, महानगरपालिका पनवेलचे अतिरिक्त आयुक्त श्री. राठोड, पनवेलचे गट विकास अधिकारी संजय भोये तसेच पंचायत समितीचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. या मेळाव्याचे नियोजन व कार्यवाहीसाठी विविध 10 समित्या स्थापन करण्यात आल्या असून येथे 18 स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. त्यांनी या कामाचा व समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
राज्य शासनाने दिव्यांग कल्याण व पुनर्वसनाच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची निर्मिती केलेली आहे. दिव्यांग कल्याण विभागाच्या आदेशान्वये दिव्यांगांच्या दारी हे अभियान राज्यातील सर्व महसूल विभागातील प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यानुसार जिल्ह्यात अभियानानिमित्त मेळावा होत आहे.
या मेळाव्यात सुमारे १ हजार दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन केले असून, दिव्यांग बांधवांना उपयुक्त साहित्य वाटप करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहून दिव्यांगासाठीच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
0000000
Comments
Post a Comment