जिल्हयातील 14 गावांमध्ये सुरु होणार प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे 19 ऑक्टोंबर रोजी उद्धाटन
रायगड(जिमाका),दि.17:- ग्रामीण भागातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार/स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे आणि जिल्हयातील मनुष्यबळाला कौशल्यपूर्ण बनविणे यासाठी 14 गावांमध्ये प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. या केंद्रांचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे गुरुवार दि.19 ऑक्टोंबर रोजी दुपारी 4.00 वाजता होणार आहे, या कार्यक्रमात जास्तीत जास्त युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कार्यक्रम पूर्वतयारी बाबत बैठक झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) विठ्ठल इनामदार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवार यासह जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी व विविध शासकीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये वित्त मंत्री यांनी महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संपूर्ण राज्यभरात ग्रामपंचायत स्तरावर कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याची घोषणा केली होती. यानुसार संपूर्ण राज्यातील 511 ग्रामपंचायतींच्या ठिकाणी 'प्रमोद महाजन ग्रामीण उद्योजकता कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.
रायगड जिल्हयामध्ये एकूण 14 ग्रामपंचायतीच्या ठिकाणी ही केंद्रे उभारली जाणार आहेत.यामध्ये अलिबाग तालुक्यातील चेंढरे, रोह्यामधील धाटाव, पनवेल तालुक्यातील करंजाडे, उरण मधील फुंडे, पोलादपूर येथील तुर्भे बुद्रुक, पेण मधील वडखळ, सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा,मुरूड येथील नांदगाव, तळा तालुक्यातील मजगाव, महाड मधील शिरवली, माणगाव मधील रतवड, खालापूर तालुक्यातील नारंगी, श्रीवर्धन येथील दिघी आणि म्हसळा तालुक्यातील खरसाई या ग्रामपंचायतीच्या ठिकाणचा समावेश आहे. या सर्व कौशल्य केंद्रावर पुढील 3 वर्षाच्या कालावधी मध्ये 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मोफत कौशल्य प्रशिक्षणे देण्यात येणार आहेत.
दिनांक 19 ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान ग्रामीण युवकांशी संवाद देखील साधणार आहेत. सदर कार्यक्रमास खासदार, आमदार व लोकप्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहाणार आहेत. प्रत्येक तालुक्यातील निश्चित ठिकाणी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून कौशल्य विकासाच्या या नवीन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment