सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक तसेच पोट निवडणूक होणाऱ्या कार्यक्षेत्रात शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांचे प्रतिबंधात्मक आदेश जारी
रायगड (जिमाका), दि.18 :- जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 40 रिक्त जागांच्या पोट निवडणूकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार निवडणूका जाहिर झाल्यापासून निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत शस्त्रास्त्रे बाळगण्यास बंदी आदेश अंमलात राहील.
जिल्हादंडाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन कार्यवाहीचा एक भाग म्हणून निवडणूकीच्या कालावधीमध्ये शस्त्राचा गैरवापर होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश दिले आहेत. अलिबाग, मुरुड, पेण, पनवेल, कर्जत, खालापूर, माणगांव, तळा, रोहा, सुधागड, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन व म्हसळा या तालुक्यातील जिल्हा कार्यक्षेत्राच्या हद्दीतील (पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र वगळून) बंदी करण्यात आली आहे.
सार्वत्रिक निवडणूक तसेच पोट निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील परवानाधारकास शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 21 व 22 नुसार या आदेशाच्या दिनांकापासून मतमोजणी दिनांक 6 नोव्हेंबर 2023 पर्यंत शस्त्र व दारुगोळ्यासह जमा करण्यास तसेच अन्य परवाना धारकांना देखील सदर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात शस्त्र आणण्यास व जवळ बाळगण्यास फौजदारी प्रक्रीया संहिता, 1973 चे कलम 144 नुसार बंदी घालण्यात आली आहे.
सदर मनाई आदेश सेवेवरील पोलीस अधिकारी, कर्मचारी, बँकेचे सुरक्षा अधिकारी, कर्मचारी आणि ज्यांना शासकीय कर्तव्याचा भाग म्हणून शस्त्राचा वापर अनुज्ञेय आहे, अशा व्यक्तींना लागू होणार नाही. त्याप्रमाणे जो समाज दिर्घकालीन स्थायी कायदा व रुढी परिपात यानुसार शस्त्रास्त्रे बाळगण्यास हक्कदार आहे, त्या समाजाला लागू असणार नाही. तथापी, अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे निदर्शनास आल्यास आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडथळा निर्माण करत असल्याचे आढळून आल्यास, अशा व्यक्तीची शस्त्रास्त्रे जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात येईल.
राज्य निवडणूक आयोगाकडील निवडणूक कार्यक्रमानुसार राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी माहे जानेवारी,2023 ते डिसेंबर,2023 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या व सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या (सदस्य् पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणूकांसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूका शांततेत, निर्भय व नि:पक्षपाती वातावरणात होण्याच्या दृष्टीने या संदर्भातील आदेश जिल्हाधिकारी अथवा अन्य संबंधित पोलीस अधिकारी यांच्याकडून काढले जातील, याची दक्षता संबंधित जिल्हाधिकारी अथवा अन्य संबंधित पोलीस अधिकारी यांच्याकडून काढले जातील, याची दक्षता संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांनी घ्यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त झाले आहेत.
००००००००
Comments
Post a Comment