रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रात रुग्णालयासाठी प्रयत्नशील --पालकमंत्री उदय सामंत पालकमंत्र्यांच्या हस्ते नवीन विश्रामगृहाचे भुमीपूजन
रायगड (जिमाका),दि.25:- रोहा तालुक्यातील धाटाव परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र आहे. या औद्योगिक क्षेत्रात सुसज्ज असे रुग्णालय असणे काळजी गरज असून यासाठी केंद्र शासन स्तरावर प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने रोहा औद्योगिक क्षेत्रात नवीन विश्रामगृहाचे भुमीपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे,अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे-पाटील, रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, तहसिलदार किशोर देशमुख, रोठ सरपंच नितीन वारंगे, धाटाव सरपंच सुवर्णा रटाटे आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री श्री.सामंत म्हणाले की, धाटाव येथील औद्योगिक क्षेत्रात काम करणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून येथील कामगार वर्गाला आरोग्याच्या दृष्टीने सोयी-सुविधा मिळाव्यात, त्याचबरोबर कामगारांची सुरक्षा महत्वाची असल्याने येथे रुग्णालय उभारणे ही काळाची गरज आहे. रुग्णालय उभारणीसाठी आवश्यक असलेली जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या परिसरातील कारखान्यांनीही पर्यावरण समतोल राखण्याचे काम करावे. तसेच धाटाव औद्योगिक क्षेत्रात फायर ब्रिगेडसाठी गाडीची मागणी करण्यात आली असून काही दिवसात हा प्रस्ताव तयार करण्यात येईल.औद्योगिक क्षेत्रातील परीसरात स्वच्छतेच्या दृष्टीने लागणाऱ्या सोयी-सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रात रुग्णालयासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवून तो लवकरात लवकर मंजूर करुन घेण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक एमआयडीसीतील इन्फ्राट्रक्चर चांगले असले पाहिजेत. जेणेकरून बाहेरील देशातील गुंतवणूकदार हे आपल्याकडे कारखाने प्रस्थापित करतील, उत्पादित मालाचा उठाव करतील. त्यामुळे रोजगार निर्मितीस मदत होईल. स्थानिकाना रोजगार उपलब्ध करून देणे ही शासनाचा भूमिका आहे. औद्यागिक क्षेत्रातील रस्त्याच्या कडेला स्ट्रीट लाईट देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, धाटाव औद्योगिक क्षेत्रात मुलभुत सुविधा उपलब्ध होत असून रोहा तालुक्यात शासनाकडून अनेक विकास कामेही होत आहेत. धाटाव औद्योगिक क्षेत्रात एएसआयच्या माध्यमातून रूग्णालयासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाला जलद गतीने पाठविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. रोहा तालुक्यातील सर्वात जुनी व विस्तारानी मोठा हा औद्योगिक क्षेत्र असून अनेक वर्षापासून विकसित होत आहे. येथे रुग्णालय उभे राहिले तर ते येथील कामागारांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरणार आहे. भुवनेश्वर ते किल्ला या रस्त्याला मंजुर मिळाल्यास ग्रामीण भागात अनेक सुविधा निर्माण होतील.
या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच धाटाव परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
०००००००
Comments
Post a Comment