आपदा मित्रांना सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व संसाधने उपलब्ध करून देण्याचे कु.तटकरे यांचे निर्देश
रायगड (जिमाका) दि. 26:- आपदा मित्र हे आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांना अधिक सक्षम व प्रभावी बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व संसाधने, मदत जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी असे निर्देश महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिले.
रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात रायगड जिल्ह्यातील आपदा मित्रांची बैठक महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या.
या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपवनसंरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हा धिकारी संदेश शिर्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांसह विविध आपदा मित्र संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महापूर, दरड दुर्घटना, आग,रस्ते अपघात अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो या घटनांमध्ये सर्वसामान्यांचा जीव वाचविण्याचं काम आपत्ती व्यवस्थापनातील आपदा मित्र करत आहेत. बोटी चालवने, तराबा हाकणं, दरीतील मृतदेह बाहेर काढणं, रस्ते अपघातातील जखमींना तात्काळ प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं, यासह आपत्ती काळात कराव्या लागणाऱ्या अनेक मदतीसाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांना यासाठी लागणारे साहित्य जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मागणीनुसार उपलब्ध करून द्याव्यात. संबंधित संस्थांनी त्यांची यादी तात्काळ जिल्हा प्रशासनास पाठवावी अशा सूचना कु.तटकरे यांनी यावेळी दिल्या. आपत्ती ठिकाणी पोहोचण्यासाठी या संस्थांना वाहन तसेच आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. जे आपदा मित्र नोकरी किंवा कामावर जात असतील तर त्यांचा हा सेवाकालावधी विना वेतन होणार नाही यासाठी संबंधित आस्थापना यांना आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत तरतुदी नुसार कळविण्यात येईल असेही कु. तटकरे यांनी सांगितले.
यावेळी अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था खोपोली, साळुंखे रेस्कु टीम,सानप रेस्कु टीम, सिसकेप रेस्कु टीम चे प्रतिनिधी उपस्थित होते.
000000
Comments
Post a Comment